Sunday, December 30, 2012

कुठला पुरुष किंवा स्त्री म्हणेल की बलात्कार व्हायलाच हवेत?


सोयीस्कर मुद्दा हातात लागला की उठ सुट आंदोलन अशी परिस्थिती आपल्याकडे उदभवली आहे. माध्यमे याला दोषी आहेत असं म्हणणंही सोईस्करच आहे. आण्णा हजारेंचे भ्रष्टाचाराविरुद्धचे आंदोलन आणि आत्ताचं बलात्कार थोपवण्यासाठी होणारं आंदोलन यातला सामान्य म्हणू पाहणाऱ्या नागरिकांचा सहभाग हा संशोधनात्मक विषय बनला आहे. साध्य आणि साधन यांच्यातले साधन मोठे झाले आहे आणि त्याविषयीची जाणीवच आंदोलनकर्त्या 'तरुणाई' उरलेली नाही. याउलट आंदोलनातून तथाकथित 'तरुणाई' भरकटतेय.

पण अगदी शांतपणे विचार केला तर लक्षात येतं की कुठला पुरुष किंवा स्त्री म्हणेल की बलात्कार व्हायलाच हवेत? कुणीच म्हणणार नाही. जाहीरच नाही तर मनातल्या मनातसुद्धा कोण म्हणेल की बलात्कार करायला काय हरकत आहे. मग बलात्काराविरुद्धची मशाल सरकारला दाखवून आपण काय साध्यं करतो आहोत?  कुणाचेही कुठलही सरकार बलात्काराला उघड आणि छुपा पाठींबा देईल काय? काळ मीटीव्हीवर (चुकून ) एक बातमी पाहिली त्यात रिपोर्टर मुलगी रात्री रस्त्यावर उभी राहून तावातावाने सांगत होती की दिल्ली रात्री सुरक्षित कशी नाहीये. इथे कुणी पोलिस नाहीये.इतका मोठ्या घटनेनंतरही सरकार झोपलेलेच आहे.

  सरकारने महिलांना सुरक्षा पुरवायला हवी हे म्हणायला आणि ऐकायला किती सोपे आहे. रस्त्यावर पोलिसांची लोकांनाच न आवडणारी गस्त वाढवली तरी बलात्कार फक्त रस्त्यावरच होतो असं मानण्यासारख आहे. (पोलिसांनी पोलिस स्टेशनात आणि जवानांनी सीमाभागात केलेल्या बलात्कारांच्या बातम्या तात्पुरत्या बाजूला ठेऊ.)

 माध्यमं आणि सर्वसामान्य आजूबाजूचे लोक अशा तत्कालीन आंदोनालाच्या वेळी असं काही बोलत असतात की नक्की कसा विचार करावा हेच कळेनासं होऊन जातं.  दिल्लीतली त्या मुलीची घटना आणि त्याला धरून चाललेलं आंदोनन यांचा ताळमेळ कसा घालावा हे ज्याचं त्यानं ठरवावं. पण काही मुद्दे नक्कीच मनात येतात की 

१) दिल्लीतला बलात्कार हा आपल्याकडचा पहिला बलात्कार नाही मग आंदोलन आत्ताच व्हायचं कारण काय?
२) दिल्लीतला बलात्कार हा खुद्द दिल्लीतलाही पहिला बलात्कार नाही. मग हे निमित्त इतकं का डोकं वर काढतंय?
३) दिल्लीशिवाय इतर जवळपासच सर्वच राज्यात,शहरात,खेड्यापाड्यात बलात्कार होतच आहेत. मग दिल्लीच का?
४) बलात्कार करणारे गुन्हेगार सापडले आहेत त्यांना आपला गुन्हा मान्य आहे. तरी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे असं मोठ्याने ओरडण्याचा नक्की अर्थ काय?
५) या गुन्हेगारांना जाहीर फाशी दिली तरी भावी गुन्हेगारांना जरब बसेल? 
६)अशी  'हमखास यशस्वी' आंदोलने ही किती घातक आहेत. कारण उद्या या गुन्ह्यातल्या गुन्हेगारांना फाशी होईल आणि' इन्साफ मिल गया'च्या नावाखाली सगळे आनंदोत्सव साजरा करणार. आंदोलन संपून जाणार. पण बलात्कार संपतील? की आंदोलक बलात्कार थोपवण्यासाठी आपलं आयुष्य वेचत राहतील मरेपर्यंत?

बलात्कार, भ्रष्टाचार आणि कुठलाही अन्याय हा निंदनीयच आहे. पण ज्या आंदोलनात खात्रीशीर, परिणामकारक आणि कायमस्वरूपी  उपाययोजनांचा अभाव आहे, इतकंच नव्हे तर मुळात अन्यायकारी  कृत्ये माणसाच्या व्यक्तिगत विचारसरणीशीच अधिक निगडीत आहेत, आणि बहुतांशी प्रसंगी ती तात्कालिक स्वरुपाची सुद्धा आहेत अशावेळी मुद्दे उचलून आंदोलनात परावर्तीत करणं हे काय कमी अन्यायकारी आहे का? मुळात ही व्यापक अर्थाने पाहायचे झाल्यास आंदोलानेच नाहीत असे वाटते.

आपली सामाजिक आणि सरकारी व्यवस्था बाजूला ठेऊ.
मी आणि माझी बायको रोज जे जगतो त्यात कुणालाही कसलाही आक्षेप नसतो. कारण ते आपल्या सामाजिक चौकटीत बसणारं आहे.

उदाहरणार्थ आपण एक मुद्दा घेऊ :  माझी बायको रोज स्वयंपाक करते. मी कधीच स्वयंपाक करीत नाही.
आता यात कुणालाही कसलाही आक्षेप नसतो. बायको आजारी असली, थकलेली असली तरी 'स्वयंपाक  करणे ' या कृतिशी ती आणि माझा समाज  कायम बांधील असल्यामुळे तिच्या स्वयपाक न करण्याच्या कृतीला तिलाच उत्तरे द्यावी लागतात. अमुक एक काम हे केवळ तिचच (स्त्री यां अर्थाने ) आहे हे माझ्या आईला सुद्धा मान्य आहे. त्यामुळे आजचा स्वयंपाक तू कर असं आई मला कधीही म्हणालेली नाही. आईने लहानपणी माझ्या बहिणीला स्वयंपाक करायला शिकवला मला नाही. मला एकूणच हे अन्यायकारी वाटत असलं तरी प्रत्यक्ष दररोज स्वयंपाक करणे हे आता माझ्यासाठी अवघड आहे. स्वयंपाक हे शंभर गोष्टीतली एक गोष्ट आहे निमित्तापुरती. आणि बाकी कैक मुद्दे माझ्यासाठी आजही अनभिज्ञच असावेत.

हे माझं रोजचं आयुष्य आहे. यात मी स्त्री-पुरुष समतेसाठी कुठल्या अर्थाने आंदोलन करू? समता हा एक विचार आहे. कृती अथवा घटना नव्हे. एकदा विचार पूर्ण झाला की त्याचा प्रभाव जगण्यातल्या प्रत्येक घटनेवर पडण्याची शक्यता अधिक असते. अमुक एक घटना घडून गेली किंवा अमुक एक कृती केली म्हणून समता कशी येईल? (हा विषय मोठा आहे याचा अंदाज असूनही मी हा लेख लिहिण्याची तात्पुरती आणि सूक्ष्म कृती केली आहे.   )  

Friday, April 13, 2012

मी, ब्लॉग आणि गोंधळ



हल्ली मुद्दामून काही लिहावं असं वाटत नाही. मात्र सुचत राहावं इतकं वाटत राहतं ते बरय. एकूणच ब्लॉग माध्यमातून चालू असलेले लिखाण पाहून माझा गोंधळच होतोत्याचं कारण असं की एकतर माझा पिंड (बहुदा. इथेही गोंधळ आहे तो आहेच) कवितेचा आहे. अगदी लिहिण्यापासून ते वाचण्यापर्यंत. दुसरं म्हणजे मी बराच लहरी महंमद आहे.  त्यातही कॉलेज वयात आपण कुणीतरी महान कवीच आहोत या भ्रमापासून ते  ‘इदं न ममम्हणेपर्यंत माझी मजल पोहोचली आहे. एकूण काय तर ऐन प्रवाहात (खरतर प्रवाहाबरोबरच पण... तसं बोलायचं नसतं) आपलं होडक घेऊन भरभर वल्हा मारत सुटलेला मी आता या अथांग जलाशयात दिशाहीन आणि निरुद्देश झालो आहे. आता ज्या कुठल्या काठावर आपली नैय्या लागेल ती लागेल. आहे ते स्विकारण्यावाचून गत्यंतर नाही. माझ्या या परिस्थितीला ब्लॉग हे माध्यम अगदीच सुटेबल आहे.  कारण इथे माझ्या सोईनुसार माझी साहित्यावरील निष्ठा आणि त्यातली प्रतिष्ठा सांभाळता येतेय. मी मनाने कवी असेलही पण मी हाडा-मासाचा कवी नाही हे माझ्या (उशिरा का होईना) लक्षात आलंय. सुबह का भुला शाम को लौट आये तो उसे भुला नही कहते किंवा सो चुहे खाके बिल्ली चली हज कोयातील नेमका कुठला युक्तिवाद मला लागू पडतो या विषयीही एक स्वतंत्र गोंधळ चालूच आहे. असो

तर इतरांच्या  ब्लॉगविषयी मी काही बोलावं असा कुठला अधिकार मला मुळीच नाही. पण माझा गोंधळ नेमका कसा होतो ते पहायला दुसरा मार्ग नाही. आपले अनुभव आपल्या शब्दात मांडू देणाऱ्या या माध्यमात एकतर कविताच खूप आहेत.  (त्याला पर्याय नाही म्हणा. कॉंग्रेस गवतासारखे कवितांच बेसुमार पिक येतंय ) पैसे कमवणे सोप्पं की अवघड? ठाऊक नाही तरीही बहुतांशी लोक पैसेच कमवतात तसच कविता लिहिणे सोप्पं की अवघड?  ठाऊक नाही तरीही बहुतांशी साहित्यिककविता() लिहितातच. या कवितांचा दर्जा हा विषय बाजूला ठेवला तर आपण कुणी वेगळे आहोत असं वाटत नाही. आणि आपण जरा वेगळ्या दर्जाचे आहोत असा अहंकारयुक्त प्रमाद करायला कुठले प्रमाणही नाही. मग आशय आणि अभिव्यक्ती या वाड़मयप्रचुर निकषांचा विचार करायचा झाल्यास माझे स्थान कितीतरी खालचे असावे. इतक्या दर्जेदार कविता अथवा लेख नक्कीच ब्लॉग या माध्यमातून सर्रास आढळतात. मी माझा (कवितांचा) ब्लॉग सुरु केला तेव्हा इतरांचे ब्लॉग वाचून काही ठरविण्याची तसदी मी घेतली नाही. याउलट आता हेच माध्यम आपले तारणहार आहे असा नवा भ्रम घेऊन मी उत्साहाने नव्या-जुन्या कविता माझ्या ब्लॉगवर पेरत बसलो. पण पुढे पुढे ब्लॉग विश्वच्या माध्यमातून अनेक ब्लॉग मला पहायला मिळाले तिथे मला पहिला धक्का बसला. तो असा की कितीतरी ब्लॉग लेखकांनी आणि चालकांनी आपले खरेखुरे नाव न देता टोपण नावाने आपले मराठी साहित्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. इथे दोन मुद्दे आहेत एकतर नाव न दिल्यामुळे एकूण साहित्य व्यवहारात प्रसिद्धीचा जो फायदा होतो त्यापासून आपसूकच ते दूर आहेत. एक प्रकारे प्रचलित आक्षेपार्ह साहित्य व्यवहाराचा तो निषेधच आहे.  दुसरं म्हणजे मुळातच माणसाचं अस्तित्व हे प्रभावी असतं. अशा वेळी आपलं लिखाण प्रभावी आहे की नाही हे जोखण्याचा हा सर्वोत्तम मार्ग असावा कारण इथे नावच नाही फक्त काम आहे. वाचक आणि रसिक यांच्यावर सोडलेली जबाबदारी. हे करायला बरीच ताकद लागते. मला हे पूर्वीही करणं शक्य झालं नाही आणि नंतर कळूनही आज पावेतो करू शकलो नाही.

माझी आणि ब्लॉगची ओळख व्हायलाही माझा चौकसपणा कामी आला नाही. माझा एक मित्र आहे अवधूत डोंगरे. त्याने दाखवलेला त्याचा रेघ हा ब्लॉग बघून मी माझा ब्लॉग सुरु केला. तो ब्लॉगही पुरेसा वाचण्याची आणि त्याचा नीटसा अर्थ लावण्याची तसदी मी घेतलीच नाही. पुढे त्याने भाऊ पाद्ध्ये, अशोक शहाणे, हमीद दलवाई , श्री. . पानवलकर इत्यादी ब्लॉग बनवले. त्यामागचा त्याचा उद्देश हाच की काळाच्या ओघात नामशेष होत जाण्याऱ्या दर्जेदार साहित्यिकांच्या नोंदी करून ठेवणे. हे करतानाही आपले नाव सायलेंट राहील याची काळजी त्याने घेतली आहे. या निरपेक्ष भावनेच्या आणि प्रयत्नांच्या तुलनेत मी क्षुद्राहून क्षुद्र आहे हे आज काल बऱ्याचदा जाणवत चाललय.  भरीत भर म्हणून उत्साहात मी त्यावेळी  हा मुकामार ब्लॉगही सुरु केला

आता सगळेच नाव लावणारे मुर्ख आहेत असाही माझा समाज नाही. मात्र नाव असो वा नसो साधं, तरल, दैनंदिन जीवनाशी जोडलेलं, अभ्यासपूर्ण आणि  प्रामाणिक भाव घेऊन व्यक्त होणारं इथलं लिखाण वाचून (पाहून) धस्स व्हायला होतं हे खरंय. (असं लिखाण मोठ्याप्रमाणात नसलं तरीही ते आहे हे महत्वाचं ) त्यातल्यात्यात जाणवणारी एक गम्मत अशी की या सगळ्याला घेऊन लिखाण करणाऱ्यांमध्ये महिला मंडळी खुपच आघाडीवर आहेत. साधे सुधे विषय, घुसमट, अनुभव व्यक्त करणाऱ्या यां महिलांच्या पोस्ट ब्लॉग माध्यमात खुपच छान वाटतात. त्यातली निरपेक्षता विशेष भावणारी आहे. संख्यात्मक दृष्टीने विचार करायचा झाल्यास पुरुषांचे ब्लॉग व्यक्त होण्यापेक्षाही काहीतरी उभारू पाहण्याच्या उद्देशाचे आहेत असे वाटते. त्यातली भावना सहज-सुलभ नाही. (आता इथे स्त्री-पुरूष हा वाद नको. शिवाय माझा हाही अभ्यास पुरेसा आहे अशातला भाग नाही. वरवर पाहता जे जाणवतं ते हे.)

साहित्यया शब्दाचा मी जो काही अर्थ लावतो आहे त्या अर्थाशी काडीमात्र संबंध नसणारे पण साहित्यावरच लिहू पाहणारे अनेक ब्लॉग आहेत. असेनात का काही लोक तर लिखाणाच काय पण टाईप करायचेही कष्ट न करता कॉपी पेस्टच्याच कामात माहीर आहेत.  त्यातल्यात्यात साहित्य सोडून इतर विषय हाताळू पाहणारे ब्लॉग बघून बरं वाटतं. (माझी त्यांच्याशी स्पर्धा नाही त्यामुळे असेल)

आता माझ्यासमोर प्रश्न असा उरतो तो हाच की, पुस्तकं, वर्तमानपत्र, ब्लॉग आणि इतर माध्यमांमध्ये चालू असलेल्या लिखाणापुढे माझं नक्की स्थान काय? की मी अगदीच निरर्थक आहे? या प्रश्नाचं उत्तर काहीका असेना मुळात हा प्रश्नच निरर्थक आहे असं वाटतं. त्यात मला माझ्या अस्तित्वाचीच भीती अधिक आहे. जन्माला आलोय म्हणजे काहीतरी करूनच मेले पाहिजे. म्हणून काहीही करण्यात काहीच अर्थ नाही. (सुधारतोय न? ग्रेट, येस, कम ऑन. J)

आता उरला भाग मी, ब्लॉग आणि गोंधळाचा तर तो तसाच चालू ठेवणारे त्याचं कारणही मला सापडलय. आपण आणि आपले लिखाण हे निरर्थक आहे हे मान्य आहे. पण जोवर आयुष्य सार्थकी लावणारी गोष्ट हाती लागत नाही तोवर स्वतःचा हा जो काही गोंधळ हाती लागलाय तोही समाधानकारक आहे. किमान तो प्रामाणिकपणे अनुभवणे-पाहणे हे माझ्या हातात आहे