Friday, December 31, 2010

गाववाला

परवा एक गाववाला मित्र दोनेक वर्षांनी भेटला म्हणे; "जमिन धरणात गेली. आमचं पुनर्वसन म्हणून जी जमिन दिलीय ती इतकी नापीक आहे की विचारू नकोस".
मनात म्हंटलं "मी कुठे विचारतोय....?"
मी म्हंटलं "मग सध्या पोटापाण्याचं काय?"
म्हंटला "तसं एका ठिकाणी ऑफिसबॉयचं काम करतोय नाही असं नाही पण खरं सांगू का?
गावाकडं होतं ते बरं होतं. इथे शहरात जीव नुसता..."(सगळं त्याच्या ग्रामिन भाषेत.)
हा भेटला की मला इरीटेट होतं. काहीही बोला हा नेहमी रडतच असतो... मी म्हंटलं "मग मिळालेल्या जमिनीचं काय करणार? विकणारेस?" म्हणाला "नाही अशी पुनर्वसनाची जमिन लगेच विकता येत नाही. नाय तर विकली असती." माझ्या "का?"वर म्हणाला "जमिनीत काय उरलय आता? " पुराण सुरू.
याला असं वाटत असावं की मी खूप सुखी आहे. का? तर मी नावापुरता गाववाला. शहरात वाढलेला. आता त्याला कोण काय करणार? असो.
त्यानं विचारलं लग्न झालं का? म्हंटलं नाही. तुझं?
म्हणाला "झालेलं। बायको सोडून गेली."
म्हंटलं "काय सांगतोयस? यातलं मला काहीच माहिती नाही। कधी?"
म्हंटला; "गावातल्या चांगल्या चमडीच्या पोरी सोडल्या तर अजून काय माहिती आहे तुम्हांला?"
"धरणात पायाखालची जमिन गेली नाही फक्त कैक आयुष्य। संसार संपले...! कुणाच्या तरी डोक्यात येतं इथे धरण बांधायचं... की बांधलं। धरणाला ना नाही; पाणी सगळ्यांना लागतं पण आज आमच्या जागेत ज्या लोकांसाठी पाणी साठवलं जातं त्या लोकांपुढं उभं रहायला भीती वाटते रे...! गाव धरणासाठी हलवायचा नाही म्हणून जे जे लढले ते आज गलेलठ्ठ झालेत. नसलेली झाडं दाखवून. त्यापैकी किती तरी लोक दारू ढोसून ढोसून संपायच्या मार्गावर आहेत.
नेत्यांनी फक्त पैसेवाल्यांनाच आपलं मानलय. पण गावातल्या टाळक्यांना कोण अक्कल देणार? ज्यांनी धरण बांधायचं ठरवलय ते हात झटकून उभेत. लोक डोळ्यांदेखत संपतातेत. बघवत नाही रे. कुठं अन कुणाचं चुकतं तेच धड कळत नाही."
"असो, असं खुप काही आहे, प्रॉब्लेम फक्त इतकाचे की गावाला काही उरलं नाही आणि शहरात कुणाला काही देणं-घेणं नाही. आज आत्महत्या केली तरी दखल घ्यायला मी शेतकरी नाही...! "
तो म्हणतोय ते सगळंच खरं असावं कारण त्याचं हे ‘रडणं’ वेगळंच वाटलं. जाता मी फ़क्त त्याचा मोबाईल नंबर घेतला आणि विचारलं "परवा काय करतो आहेस? भेटूयात."

Wednesday, December 8, 2010

महासत्तेचा बुडबुडा

भारत महासत्ता बनेल म्हणजे नेमकं काय घडेल?
आपण खुप सुखवस्तू झालेले असू? की किमान पातळीवर भूकबळी, दारीद्र्य, बेरोजगारी अशा समस्यांचं उच्चाटन होईल? आपल्याला ठाऊक नाही। कारण ‘भारत महासत्ता बनणार आहे.’ येवढी गोष्ट ऐकूनच बरं वाटतं. मग महासत्ता म्हणजे नेमकं काय याची दखल घेतली काय नि नाही काय ? काय फ़रक पडतो आपल्याला?
पण आपल्याला आपल्या अज्ञानाची किंमत चूकती करावी लागणारच आहे. आजही आपण ती चूकती करतो आहोत. असो. मूळात महासत्ता म्हणजे नेमकं काय याचं ठोस उत्तर कुठल्याच राजकारण्याकडे नाही. आठवड्याला एक या प्रमाणे राजकारणी आणि त्यांच्या संगनमाताने होत असलेले घोटाळे बाहेर पडू लागले आहेत.(उघड न होणारे घोटाळे वेगळे.) या सर्व घोटाळ्यांचं खापर एखाद्या सोईच्या व्यक्तीवर फ़ोडलं जातं. त्यात त्याला शिक्षाही पुरेशी होत नाही. शिवाय पब्लिकचा पैसाही परत मिळण्याचा प्रश्न उत्पन्न होत नाही.एकाही राजकारण्याकडे स्वत:ची अशी कुठली ‘विकस योजना’ नाही. पण हवे ते खाते मिळवण्याची महत्वाकांक्षा तेवढी नक्की आहे. ती सुद्धा उघड.
इकडे आपण कळत असून दुर्लक्ष करणारेच आहोत. आपल्याकडे सुद्धा स्वतःच्या भविष्याचा कुठला प्लॅन असतो. आणि तसाच तो सामाजिक पातळीवरही नसतो. शहरांमधे आज जी बकाली झाली आहे. त्याला आपणच जबाबदार आहोत. आणि अशी बकाली घालवायला आपल्याला खुप कष्ट देखिल पडणार नाहीयेत। पण तरी आपण साध्या-सुध्या गोष्टी करणं शक्य असूनही करत नाही. त्याची किंमत आपणच चूकवतो आहोत.
भारत महासत्ता बनो न बनो. आपण महासत्तेसाठी लागणा-या मानसिकतेपासून कोसो दूर आहोत. तेव्हा आपले राजकारणी काहीही बरळोत., अशा बुडबूड्यांमधे शिरून आपल्या हाती काय लागणार आहे हे ज्याचं त्याने ठरवावं. आपले ‘साहेब’ मंत्री झाले तरी आपल्याला कुणी फ़ुकट जेवायला घालत नाही. त्यासाठी शांत राहून कष्ट करावेच लागतात.