Sunday, December 30, 2012

कुठला पुरुष किंवा स्त्री म्हणेल की बलात्कार व्हायलाच हवेत?


सोयीस्कर मुद्दा हातात लागला की उठ सुट आंदोलन अशी परिस्थिती आपल्याकडे उदभवली आहे. माध्यमे याला दोषी आहेत असं म्हणणंही सोईस्करच आहे. आण्णा हजारेंचे भ्रष्टाचाराविरुद्धचे आंदोलन आणि आत्ताचं बलात्कार थोपवण्यासाठी होणारं आंदोलन यातला सामान्य म्हणू पाहणाऱ्या नागरिकांचा सहभाग हा संशोधनात्मक विषय बनला आहे. साध्य आणि साधन यांच्यातले साधन मोठे झाले आहे आणि त्याविषयीची जाणीवच आंदोलनकर्त्या 'तरुणाई' उरलेली नाही. याउलट आंदोलनातून तथाकथित 'तरुणाई' भरकटतेय.

पण अगदी शांतपणे विचार केला तर लक्षात येतं की कुठला पुरुष किंवा स्त्री म्हणेल की बलात्कार व्हायलाच हवेत? कुणीच म्हणणार नाही. जाहीरच नाही तर मनातल्या मनातसुद्धा कोण म्हणेल की बलात्कार करायला काय हरकत आहे. मग बलात्काराविरुद्धची मशाल सरकारला दाखवून आपण काय साध्यं करतो आहोत?  कुणाचेही कुठलही सरकार बलात्काराला उघड आणि छुपा पाठींबा देईल काय? काळ मीटीव्हीवर (चुकून ) एक बातमी पाहिली त्यात रिपोर्टर मुलगी रात्री रस्त्यावर उभी राहून तावातावाने सांगत होती की दिल्ली रात्री सुरक्षित कशी नाहीये. इथे कुणी पोलिस नाहीये.इतका मोठ्या घटनेनंतरही सरकार झोपलेलेच आहे.

  सरकारने महिलांना सुरक्षा पुरवायला हवी हे म्हणायला आणि ऐकायला किती सोपे आहे. रस्त्यावर पोलिसांची लोकांनाच न आवडणारी गस्त वाढवली तरी बलात्कार फक्त रस्त्यावरच होतो असं मानण्यासारख आहे. (पोलिसांनी पोलिस स्टेशनात आणि जवानांनी सीमाभागात केलेल्या बलात्कारांच्या बातम्या तात्पुरत्या बाजूला ठेऊ.)

 माध्यमं आणि सर्वसामान्य आजूबाजूचे लोक अशा तत्कालीन आंदोनालाच्या वेळी असं काही बोलत असतात की नक्की कसा विचार करावा हेच कळेनासं होऊन जातं.  दिल्लीतली त्या मुलीची घटना आणि त्याला धरून चाललेलं आंदोनन यांचा ताळमेळ कसा घालावा हे ज्याचं त्यानं ठरवावं. पण काही मुद्दे नक्कीच मनात येतात की 

१) दिल्लीतला बलात्कार हा आपल्याकडचा पहिला बलात्कार नाही मग आंदोलन आत्ताच व्हायचं कारण काय?
२) दिल्लीतला बलात्कार हा खुद्द दिल्लीतलाही पहिला बलात्कार नाही. मग हे निमित्त इतकं का डोकं वर काढतंय?
३) दिल्लीशिवाय इतर जवळपासच सर्वच राज्यात,शहरात,खेड्यापाड्यात बलात्कार होतच आहेत. मग दिल्लीच का?
४) बलात्कार करणारे गुन्हेगार सापडले आहेत त्यांना आपला गुन्हा मान्य आहे. तरी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे असं मोठ्याने ओरडण्याचा नक्की अर्थ काय?
५) या गुन्हेगारांना जाहीर फाशी दिली तरी भावी गुन्हेगारांना जरब बसेल? 
६)अशी  'हमखास यशस्वी' आंदोलने ही किती घातक आहेत. कारण उद्या या गुन्ह्यातल्या गुन्हेगारांना फाशी होईल आणि' इन्साफ मिल गया'च्या नावाखाली सगळे आनंदोत्सव साजरा करणार. आंदोलन संपून जाणार. पण बलात्कार संपतील? की आंदोलक बलात्कार थोपवण्यासाठी आपलं आयुष्य वेचत राहतील मरेपर्यंत?

बलात्कार, भ्रष्टाचार आणि कुठलाही अन्याय हा निंदनीयच आहे. पण ज्या आंदोलनात खात्रीशीर, परिणामकारक आणि कायमस्वरूपी  उपाययोजनांचा अभाव आहे, इतकंच नव्हे तर मुळात अन्यायकारी  कृत्ये माणसाच्या व्यक्तिगत विचारसरणीशीच अधिक निगडीत आहेत, आणि बहुतांशी प्रसंगी ती तात्कालिक स्वरुपाची सुद्धा आहेत अशावेळी मुद्दे उचलून आंदोलनात परावर्तीत करणं हे काय कमी अन्यायकारी आहे का? मुळात ही व्यापक अर्थाने पाहायचे झाल्यास आंदोलानेच नाहीत असे वाटते.

आपली सामाजिक आणि सरकारी व्यवस्था बाजूला ठेऊ.
मी आणि माझी बायको रोज जे जगतो त्यात कुणालाही कसलाही आक्षेप नसतो. कारण ते आपल्या सामाजिक चौकटीत बसणारं आहे.

उदाहरणार्थ आपण एक मुद्दा घेऊ :  माझी बायको रोज स्वयंपाक करते. मी कधीच स्वयंपाक करीत नाही.
आता यात कुणालाही कसलाही आक्षेप नसतो. बायको आजारी असली, थकलेली असली तरी 'स्वयंपाक  करणे ' या कृतिशी ती आणि माझा समाज  कायम बांधील असल्यामुळे तिच्या स्वयपाक न करण्याच्या कृतीला तिलाच उत्तरे द्यावी लागतात. अमुक एक काम हे केवळ तिचच (स्त्री यां अर्थाने ) आहे हे माझ्या आईला सुद्धा मान्य आहे. त्यामुळे आजचा स्वयंपाक तू कर असं आई मला कधीही म्हणालेली नाही. आईने लहानपणी माझ्या बहिणीला स्वयंपाक करायला शिकवला मला नाही. मला एकूणच हे अन्यायकारी वाटत असलं तरी प्रत्यक्ष दररोज स्वयंपाक करणे हे आता माझ्यासाठी अवघड आहे. स्वयंपाक हे शंभर गोष्टीतली एक गोष्ट आहे निमित्तापुरती. आणि बाकी कैक मुद्दे माझ्यासाठी आजही अनभिज्ञच असावेत.

हे माझं रोजचं आयुष्य आहे. यात मी स्त्री-पुरुष समतेसाठी कुठल्या अर्थाने आंदोलन करू? समता हा एक विचार आहे. कृती अथवा घटना नव्हे. एकदा विचार पूर्ण झाला की त्याचा प्रभाव जगण्यातल्या प्रत्येक घटनेवर पडण्याची शक्यता अधिक असते. अमुक एक घटना घडून गेली किंवा अमुक एक कृती केली म्हणून समता कशी येईल? (हा विषय मोठा आहे याचा अंदाज असूनही मी हा लेख लिहिण्याची तात्पुरती आणि सूक्ष्म कृती केली आहे.   )  

Friday, April 13, 2012

मी, ब्लॉग आणि गोंधळ



हल्ली मुद्दामून काही लिहावं असं वाटत नाही. मात्र सुचत राहावं इतकं वाटत राहतं ते बरय. एकूणच ब्लॉग माध्यमातून चालू असलेले लिखाण पाहून माझा गोंधळच होतोत्याचं कारण असं की एकतर माझा पिंड (बहुदा. इथेही गोंधळ आहे तो आहेच) कवितेचा आहे. अगदी लिहिण्यापासून ते वाचण्यापर्यंत. दुसरं म्हणजे मी बराच लहरी महंमद आहे.  त्यातही कॉलेज वयात आपण कुणीतरी महान कवीच आहोत या भ्रमापासून ते  ‘इदं न ममम्हणेपर्यंत माझी मजल पोहोचली आहे. एकूण काय तर ऐन प्रवाहात (खरतर प्रवाहाबरोबरच पण... तसं बोलायचं नसतं) आपलं होडक घेऊन भरभर वल्हा मारत सुटलेला मी आता या अथांग जलाशयात दिशाहीन आणि निरुद्देश झालो आहे. आता ज्या कुठल्या काठावर आपली नैय्या लागेल ती लागेल. आहे ते स्विकारण्यावाचून गत्यंतर नाही. माझ्या या परिस्थितीला ब्लॉग हे माध्यम अगदीच सुटेबल आहे.  कारण इथे माझ्या सोईनुसार माझी साहित्यावरील निष्ठा आणि त्यातली प्रतिष्ठा सांभाळता येतेय. मी मनाने कवी असेलही पण मी हाडा-मासाचा कवी नाही हे माझ्या (उशिरा का होईना) लक्षात आलंय. सुबह का भुला शाम को लौट आये तो उसे भुला नही कहते किंवा सो चुहे खाके बिल्ली चली हज कोयातील नेमका कुठला युक्तिवाद मला लागू पडतो या विषयीही एक स्वतंत्र गोंधळ चालूच आहे. असो

तर इतरांच्या  ब्लॉगविषयी मी काही बोलावं असा कुठला अधिकार मला मुळीच नाही. पण माझा गोंधळ नेमका कसा होतो ते पहायला दुसरा मार्ग नाही. आपले अनुभव आपल्या शब्दात मांडू देणाऱ्या या माध्यमात एकतर कविताच खूप आहेत.  (त्याला पर्याय नाही म्हणा. कॉंग्रेस गवतासारखे कवितांच बेसुमार पिक येतंय ) पैसे कमवणे सोप्पं की अवघड? ठाऊक नाही तरीही बहुतांशी लोक पैसेच कमवतात तसच कविता लिहिणे सोप्पं की अवघड?  ठाऊक नाही तरीही बहुतांशी साहित्यिककविता() लिहितातच. या कवितांचा दर्जा हा विषय बाजूला ठेवला तर आपण कुणी वेगळे आहोत असं वाटत नाही. आणि आपण जरा वेगळ्या दर्जाचे आहोत असा अहंकारयुक्त प्रमाद करायला कुठले प्रमाणही नाही. मग आशय आणि अभिव्यक्ती या वाड़मयप्रचुर निकषांचा विचार करायचा झाल्यास माझे स्थान कितीतरी खालचे असावे. इतक्या दर्जेदार कविता अथवा लेख नक्कीच ब्लॉग या माध्यमातून सर्रास आढळतात. मी माझा (कवितांचा) ब्लॉग सुरु केला तेव्हा इतरांचे ब्लॉग वाचून काही ठरविण्याची तसदी मी घेतली नाही. याउलट आता हेच माध्यम आपले तारणहार आहे असा नवा भ्रम घेऊन मी उत्साहाने नव्या-जुन्या कविता माझ्या ब्लॉगवर पेरत बसलो. पण पुढे पुढे ब्लॉग विश्वच्या माध्यमातून अनेक ब्लॉग मला पहायला मिळाले तिथे मला पहिला धक्का बसला. तो असा की कितीतरी ब्लॉग लेखकांनी आणि चालकांनी आपले खरेखुरे नाव न देता टोपण नावाने आपले मराठी साहित्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. इथे दोन मुद्दे आहेत एकतर नाव न दिल्यामुळे एकूण साहित्य व्यवहारात प्रसिद्धीचा जो फायदा होतो त्यापासून आपसूकच ते दूर आहेत. एक प्रकारे प्रचलित आक्षेपार्ह साहित्य व्यवहाराचा तो निषेधच आहे.  दुसरं म्हणजे मुळातच माणसाचं अस्तित्व हे प्रभावी असतं. अशा वेळी आपलं लिखाण प्रभावी आहे की नाही हे जोखण्याचा हा सर्वोत्तम मार्ग असावा कारण इथे नावच नाही फक्त काम आहे. वाचक आणि रसिक यांच्यावर सोडलेली जबाबदारी. हे करायला बरीच ताकद लागते. मला हे पूर्वीही करणं शक्य झालं नाही आणि नंतर कळूनही आज पावेतो करू शकलो नाही.

माझी आणि ब्लॉगची ओळख व्हायलाही माझा चौकसपणा कामी आला नाही. माझा एक मित्र आहे अवधूत डोंगरे. त्याने दाखवलेला त्याचा रेघ हा ब्लॉग बघून मी माझा ब्लॉग सुरु केला. तो ब्लॉगही पुरेसा वाचण्याची आणि त्याचा नीटसा अर्थ लावण्याची तसदी मी घेतलीच नाही. पुढे त्याने भाऊ पाद्ध्ये, अशोक शहाणे, हमीद दलवाई , श्री. . पानवलकर इत्यादी ब्लॉग बनवले. त्यामागचा त्याचा उद्देश हाच की काळाच्या ओघात नामशेष होत जाण्याऱ्या दर्जेदार साहित्यिकांच्या नोंदी करून ठेवणे. हे करतानाही आपले नाव सायलेंट राहील याची काळजी त्याने घेतली आहे. या निरपेक्ष भावनेच्या आणि प्रयत्नांच्या तुलनेत मी क्षुद्राहून क्षुद्र आहे हे आज काल बऱ्याचदा जाणवत चाललय.  भरीत भर म्हणून उत्साहात मी त्यावेळी  हा मुकामार ब्लॉगही सुरु केला

आता सगळेच नाव लावणारे मुर्ख आहेत असाही माझा समाज नाही. मात्र नाव असो वा नसो साधं, तरल, दैनंदिन जीवनाशी जोडलेलं, अभ्यासपूर्ण आणि  प्रामाणिक भाव घेऊन व्यक्त होणारं इथलं लिखाण वाचून (पाहून) धस्स व्हायला होतं हे खरंय. (असं लिखाण मोठ्याप्रमाणात नसलं तरीही ते आहे हे महत्वाचं ) त्यातल्यात्यात जाणवणारी एक गम्मत अशी की या सगळ्याला घेऊन लिखाण करणाऱ्यांमध्ये महिला मंडळी खुपच आघाडीवर आहेत. साधे सुधे विषय, घुसमट, अनुभव व्यक्त करणाऱ्या यां महिलांच्या पोस्ट ब्लॉग माध्यमात खुपच छान वाटतात. त्यातली निरपेक्षता विशेष भावणारी आहे. संख्यात्मक दृष्टीने विचार करायचा झाल्यास पुरुषांचे ब्लॉग व्यक्त होण्यापेक्षाही काहीतरी उभारू पाहण्याच्या उद्देशाचे आहेत असे वाटते. त्यातली भावना सहज-सुलभ नाही. (आता इथे स्त्री-पुरूष हा वाद नको. शिवाय माझा हाही अभ्यास पुरेसा आहे अशातला भाग नाही. वरवर पाहता जे जाणवतं ते हे.)

साहित्यया शब्दाचा मी जो काही अर्थ लावतो आहे त्या अर्थाशी काडीमात्र संबंध नसणारे पण साहित्यावरच लिहू पाहणारे अनेक ब्लॉग आहेत. असेनात का काही लोक तर लिखाणाच काय पण टाईप करायचेही कष्ट न करता कॉपी पेस्टच्याच कामात माहीर आहेत.  त्यातल्यात्यात साहित्य सोडून इतर विषय हाताळू पाहणारे ब्लॉग बघून बरं वाटतं. (माझी त्यांच्याशी स्पर्धा नाही त्यामुळे असेल)

आता माझ्यासमोर प्रश्न असा उरतो तो हाच की, पुस्तकं, वर्तमानपत्र, ब्लॉग आणि इतर माध्यमांमध्ये चालू असलेल्या लिखाणापुढे माझं नक्की स्थान काय? की मी अगदीच निरर्थक आहे? या प्रश्नाचं उत्तर काहीका असेना मुळात हा प्रश्नच निरर्थक आहे असं वाटतं. त्यात मला माझ्या अस्तित्वाचीच भीती अधिक आहे. जन्माला आलोय म्हणजे काहीतरी करूनच मेले पाहिजे. म्हणून काहीही करण्यात काहीच अर्थ नाही. (सुधारतोय न? ग्रेट, येस, कम ऑन. J)

आता उरला भाग मी, ब्लॉग आणि गोंधळाचा तर तो तसाच चालू ठेवणारे त्याचं कारणही मला सापडलय. आपण आणि आपले लिखाण हे निरर्थक आहे हे मान्य आहे. पण जोवर आयुष्य सार्थकी लावणारी गोष्ट हाती लागत नाही तोवर स्वतःचा हा जो काही गोंधळ हाती लागलाय तोही समाधानकारक आहे. किमान तो प्रामाणिकपणे अनुभवणे-पाहणे हे माझ्या हातात आहे

Monday, July 25, 2011

अ'राजकीय'

ब-याचदा राजकीय पुढारी आपला पुढारपणा सगळ्याच बाबतीत दाखवत असतात. (काही अपवाद वगळू) पण कधी कधी त्यांचा हाच स्वभाव त्यांच्याच अंगलट कसा येतो त्याचा पुण्यात घडलेला हा एक मजेशीर किस्सा.

एक सन्माननीय राजकीय महाशय! (नुकतच त्यांच्या निवडीवरून एका राजकीय पक्षात मानापमान-संशयकल्लोळ-नाथ हा माझा-नाथा पुरे आता अशा आशयाच राजकीय नाट्याच क्रमशः थेट प्रक्षेपण घडून गेल्याचं आपल्या लक्षात असेलच. नेमक्या त्याच टायमाची गोष्ट.)(नाव मुद्दामहून सांगत नाही. घाबरतो. माफी!) सोयीसाठी त्याचं नाव आपण ‘अमुक अमुक’ असं मानू.

मुद्दा असा... की एका नामांकित दवाखान्यात गर्दीच्या वेळी फोन खणखणला आणि अचानक गडबड सुरु झाली. रिसेप्शनिस्टबाई डॉक्टरांच्या केबिनमध्ये पळाल्या. केबनही कधी नव्हे ते अस्वस्थ झालं. रांगेतले पेशंट आणि त्यांचे नातेवाईक संदिग्ध होऊन पाहू लागले. रिसेप्शनिस्ट काउंटरवर येताच "काय झालं हो? सिरीयस आहे का काही?" वगैरे वगैरे म्हणत नातेवाईक-पेशंट सरसावले. रिसेप्शनिस्ट म्हणाली; "अमुक अमुक त्यांच्या मुलीला घेऊन येत आहेत." आता हे अमुक अमुक नेमक्या त्याच काळात भलतेच हिट झाल्यामुळे गर्दीत कुजबुज वाढली. इतक्या वेळ अंगातली दुखणी घेऊन बसलेल्या बाकड्यांवर राजकीय दुखणी कण्हली जाऊ लागली.

जेमतेम दहाच मिनिटात अमुक अमुक महाशयांनी दवाखान्यात एन्ट्री मारली. रिसेप्शनिस्टबाईंनी ‘जबाबदारी’च्या ओझ्याखाली आपली भूमिका हसतमुख पार पाडली आणि केबिनचे दार उघडे करून दिले. आत जाण्यापूर्वी अमुक अमुकांनी पेशंट आणि नातेवाईकांकडे कृतार्थ नजर टाकली . वर आशिर्वादासारखा हातही उंचावला. लोकही आस्ते आस्ते सुखावले. कारण सुरवातीला सगळ्यांना असं वाटलं की ते कुण्या ओळखीच्या माणसालाच हात करताहेत. सगळ्यांनी एकमेकांकडे पाहून झाल्यावर काय ते ओळखलं.
हा ‘राजकीय पेच’ निर्माण झाला आणि नेमक्या त्याच वेळी ज्यांचा नंबर आला होता त्या सूनबाई जाम वैतागल्या होत्या। आपल्या ९२ वर्षांच्या सासूबाईंना लांबवरून आणून त्या दीडतास दवाखान्यात बसल्या होत्या. अमुक अमुक आत गेल्यापासून त्या फक्त रिसेप्शनिस्टपाशीच तळ ठोकून होत्या. "ही काही पद्धत झाली का? आधी सांगायला काय होतं? म्हातारं माणूस आहे. नंबर लावून काय फायदा?" वगैरे वगैरे. सुनबाईंच्या चढलेल्या पा-यामुळे म्हणा (अज्ञान होतच) की काय पण हे अमुक अमुक महाशय म्हणजे नेमके कोण नि काय याचा थांग पत्ता बाईना नव्हता. त्याचं नाव सोडलं तर त्यांच्या विषयी इतर काही माहिती करून घ्यायची तसदीही त्या बाईंनी मिळालेल्या वेळेत घेतली नाही. झालं...


वीसेक मिनिटांच्या तपश्चर्येनंतर अमुक अमुक पुन्हा त्याच कृतार्थतेची भावना चेहऱ्यावर घेऊन केबिनबाहेर आले. स्मित हास्य करत लोकंकडे बघतो न् बघतो तोच अमुक अमुक महाशयांवर त्या वैतागलेल्या सूनबाई कडाडल्या. अहो! एक मिनिट, तुम्ही जे कोणी असाल आम्हाला काही घेणं नाही. आम्ही काही मुर्ख आहोत का चार चार दिवस आधी नंबर लावायला आणि दोनदोन तास इथे वाट बघत बसायला? आले की चालले आत. जग म्हणजे काही जहागिरी वाटली काय?" बाईंचा टिपेचा स्वर ऐकून डॉक्टरही बाहेर आले.

आता यावर त्या महाशयांना शांत राहून मुद्दा हाताळताही आला असता. पण तेही त्या सुनबाईंच्या तारेला तार जुळवत म्हणाले ; "ओ बाई तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कुणाशी बोलताय?". बाई त्यांचा चढा आवाज ऐकून किंचित गडबडल्या ख-या पण वैतागाच्या भरात रिसेप्शन काउंटरवरची वही उलगडून म्हणाल्या; "ही आजची डेट आणि ही आज अपॉइंटमेंट असलेल्या पेशंट्सची नावे. यात मला तुमचं नाव दाखवा." तोच काही लोकांनी मध्ये पडून "सोडून द्या ताई. होतं असं. तेही बरेच बिझी असतात" असं सांगत प्रकरण शमवण्याचा प्रयत्नही केला. पण तरी त्या अमुक अमुक महाशयांचं नमतं म्हणून नाहीच; "हे बघा बाई मी दवाखान्यात एक फोन केला. मुलीसाठी सांगितलं, दवाखान्यातून ‘या’ असं मला कळवलं तेव्हा मी इथे आलोय. आता दावाखान्याने मला आधी नंबर दिला असला तर त्यात माझी काय चूक?" मुद्दा डॉक्टरांच्या कोर्टात गेल्यामुळे महाशयांची सरशी होणार असा विचार सगळ्यांच्या मनात येतो न् येतो तोच बाईंनी फूलटॉस टाकला. "वा वा वा वा. फोन केलात हे खरंय हो आम्ही सगळे इथेच होतो. पण त्या फोनवर आपण कोण आहात हे सांगायला नाही विसरलात ते? डॉक्टर काय करणार? " खेळ खल्लास.

अमुक अमुक महाशय तिरसटपणे मान झटकून दाराबाहेर पडले. सूनबाई सासूबाईंकडे वळल्या. लोकांमध्ये जरा खसखस पिकली. सूनबाईंच्या धाडसाचं नि त्याहून जास्त त्यांच्या हजरजबाबीपणाचं सगळ्यांनी अप्रूप व्यक्त केलं. शेवटी ९२ वर्षांच्या त्या आजीबाईंना घेऊन त्या डॉक्टरांसमोर बसल्या तेव्हा सूनबाई डॉक्टरांना म्हणाल्या; "माफ करा डॉक्टर. आमच्यामुळे...". डॉक्टर तत्काळ प्रांजळपणे म्हणाले ; "माफी कसली मागताय? उलट मीच तुमचे आभार मानायला हवेत. जे काम मला इतक्या वर्षात जमलं नाही ते तुम्ही चुटकी सरशी करून दाखवलंत. थँक्स!"

समांतर आणि सकारात्मक

किस्सा जवळपास तसाच. पात्रं वेगळी. (भ्यायचं कारण नाही म्हणून सागतो), कोथरूडच्या महात्मा सोसायटी वॉर्डचे मनसेचे नगरसेवक राजाभाऊ गोरडे यांच्या पत्नी याचं परिसरातल्या एका क्लिनिकमध्ये तपासणीसाठी गेल्या. ही गर्दी. (आपल्याकडं गर्दीला काही तोटाच नाहीये राव. जेवढे लोक क्रांति करायची म्हणताहेत तेवढ्याच लोकांना याच क्रांतिविषयी काही कल्पनाच नाहीये. असो. हे उगीचच :) क्रिएटीव्ह. असतो एकेकाचा पिंड.)

मुद्दा असा की मिसेस गोरडे क्लिनिकला गेल्या नंबर लावला. (आपण कोण आहोत हे त्यांनी मुद्दामून सांगितलं नाही; आणि ना त्या क्लिनिकच्या पोरीला ते माहित होतं.)
रांगेतल्या काही माणसांनी मात्र त्यांना ओळखलं आणि आपल्या पत्नी ऐवजी तुम्ही गेलात तरी चालेल अशी आदर वजा विनंतीही त्यांनी मिसेस गोरडेंना केल. तासाभराच्या त्या प्रतीक्षेत विचारणार्‍या प्रत्येकालाच त्यांनी शांतपणे उत्तर दिले, "नो, थँक्यू. माझा नंबर आला की जाते मी."


तात्पर्य :

आपल्या पदाचा अन् अधिकाराचा गैरवापर राजकीय लोकच करतात असं नाही. आपणही आपल्या पातळीवर तेच करत असतो. (राजकारण्यांना बदामान करणे हा या लेखामागचा उद्देश नव्हे.) आपल्याच अशा वृत्तीमुळे काही राजकारणीही असे वागायला धजावत असावेत. शेवटी मुठभर लोकांच्याच विकासाला आपणच कारणीभूत असूच ना?
(शंकेला आणि सुधारणेला बराच वाव)...
 

Wednesday, May 25, 2011

आईस्क्रीम : बचके रहना ...

आईस्क्रीम खायला तसं सगळ्यांनाच आवडतं. आणि आता तर उन्हाळाच काय पण १२ महिने आईस्क्रीम खायची एक संस्कृती तयार झाली आहे. मधुमेही रुग्णांसाठी देखील शुगर फ्री पर्याय उपलब्घ झाले आहेत. बड्या बड्या कंपन्या आकर्षक आउटलेट्स उघडून खवैय्ये मंडळींना मेजवानी देण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतो आहोत. पण याच आईस्क्रमच्या पडद्यामागे अनेक गोष्टी आहेत. कदाचित त्या पासून आपण अनभिज्ञच आहोत.

मध्ये एका मिटींगसाठी आमच्या एका सरांनी मला हॉटेलमध्ये बोलावलं होत. तेव्हा माझ्या आधी सरांची अजून एका माणसाबरोबर मिटींग चालू होती. मी त्यांच्या मिटींगचा प्रेक्षक झालो गेलो. तो माणूस आईस्क्रीमचे निरनिराळे आणि नवनवीन फ्लेवर्स बनवतो आणि आईस्क्रीम कंपन्यांना विकतो. आता त्याला स्वतःचे आउटलेट उघडायचे आहे. त्यासाठी फायनांस करा म्हणून तो त्या सरांना पटवत होता. तो जे काही सांगत होता ते ऐकून मी उडालोच.

त्याच्या म्हणण्यानुसार त्याने अनेक नवीन फ्लेवर्स बनवले आहेत. जे काही कंपन्यांनी विकत घेतली असून सध्या मार्केटमध्ये लोकांना खूप आवडताहेत. ते आवडणाऱ्यात मीही एक होतोच.

तो म्हणाला ; आता मी लेमन आईस्क्रीम मध्ये ४ नवीन फ्लेवर्स बनवले आहेत. जे मला कुठल्याच कंपनीला विकायचे नाहीयेत. हे फ्लेवर्स लोकांना खूप आवडणार आहेत. ज्याचा आपल्याला आउटलेट उघडून फायदा उठवता येईल.

त्यावर सरांनी त्याला एक साधा प्रश्न विचारला की ; समजा आपण आउटलेट उघडलं आणि तुझा हा लेमन फ्लेवर लोकांना आवडला नाही तर तू त्या लेमन फ्लेवरचे जे उत्पादन करशील ते किती दिवस राहू शकत? लोकांना ते आवडेपर्यंत जो काळ जाईल तोवर ते आईस्क्रीम वाया जाणार मग ते नुकसान कुणी सोसायच? . पुढे सरांचे अनेक प्रश्न होतेच. वीज खर्च, दुध , कच्चा माल इत्यादी.

त्यावर तो आपले तंत्रज्ञान किती भारी आहे हे सांगताना म्हणाला की ; त्याची काही काळजी करू नका. मुळात हे आईस्क्रीम कधीच खराब होत नाही. अगदी आठ दिवस लाईट नसले तरीही...

आम्ही चकित झालो . सरांनी विचारलं ; ते कस काय? दुध आहे ते खराब होणारच.

तो तत्काळ म्हणाला ; छे छे. दुधापासून आईस्क्रीम बनवण्याचे दिवस केव्हाच संपलेत.

मग कशापासून बनवतोस बाबा आईस्क्रीम ?”

डालडा तुपापासून!

डालडा तूऽऽऽऽप?

आज काळ एखाद दोन कंपन्या सोडल्या तर सगळे डालडाच वापरतात आणि त्यामुळेच ते परवडतं. आता आईस्क्रीम मध्ये एकही थेंब दुध नसतं. डालडाला थोडी प्रोसेस केली आणि त्यात फ्लेवर्स मिक्स केले की कळतही नाही की डालडा तूप आहे. शिवाय ते दुधाच्या आईस्क्रीमपेक्षा खाताना जास्त मऊ लागतं. आणि तेच लोकांना आवडतं. डालडा आईस्क्रीम जिभेवर येताच त्वरित विरघळते आणि गिळले जाते. शिवाय थंडपणा आणि तुपकटपणा यामधून तोंडात जे तयार होते ते नक्की काय आहे हा विचार लोक करीत नाहीत. पण तेच लोकांना आवडते. लोक अशाच स्वादाला पसंती देतात.

तो भरात येऊन त्याच्या तंत्राच मार्केटिंग करत होता आणि आम्ही आमचा इतिहास पोटात ढवळत बसलो होतो.

पुढे तो सांगत होता; डालडा आईस्क्रीमचं वैशिष्ट्य असं की ते डालडा सामान्य तापमानात कितीही काळ राहिला तरीही अजिबात खराब होत नाही. याउलट दुधाला मात्र सारखं फ्रीजिंग लागतं. शिवाय दुधाच्या आईस्क्रीमला ८-१० दिवसांनी वास येतो. आणि १५ दिवसात ते खराब होऊन जातं. त्यामुळे खर्च वाढतो. डालडा आईस्क्रीम २ वर्ष फ्रीजच्या बाहेर राहिलं तरी फरक पडत नाही, त्याचे फ्लेवर्सही खराब होत. नाहीत.

डालडा आईस्क्रीमसाठी लाईट खुपच कमी लागते. १० डिग्री तापमानातही त्याचा आईस्क्रीम फील येतो. तर दुधाच्या आईस्क्रीमसाठी उणे तापमानाची (नक्की किती ते लक्षात नाही.) गरज असते. सहाजिकच दुधाच्या आईस्क्रीमच्या विजेचा खर्च वाढतो.

शिवाय दुधापेक्षा डालडा कच्चा माल म्हणून जास्त स्वस्त आहे. तस ते हाताळणी आणि प्रोसेसलाही खूप सोपे आहे. दुधाचे रोजचे कलेक्शन, त्याचे फ्रीजिंग आणि साठवण याचा विचार करता त्याची जी बेसिक किंमत होते. त्या किंमतीतही लोकांना ते आईस्क्रीम खाण परवडू शकत नाही. डालडा आईस्क्रीम मध्ये खूप मोठे प्रोफिट मार्जिन आहे. म्हणूनच आजकाल इतके पॉश आईस्क्रीम आउटलेट निघू शकतात.

डालडा आईस्क्रीम उत्पादनाचा आणखी एक फायदा असा आहे की एकच प्रोडक्शन युनिट चालवून भारत भर कुठेही आपण याचे वितरण करू शकतो. तेही कमी खर्चात. दुधाच्या आईस्क्रीमला तो बेनिफिट नाही. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रोडक्शन युनिट सुरु करावे लागेल.

तो रंगात आला होता. त्याने त्याचे नवीन लेमन फ्लेवर टेस्ट करायला दिले. मला डालडा आईस्क्रिम खाल्ल्यामुळे नक्की काय तोटा होतो ते माहीत नाही. पण त्यानंतर आईस्क्रीम खायची मजा निघून गेली इतकं नक्की.

Saturday, January 22, 2011

संजयचा खून आणि ...

‘कुख्यात गुंड’ संजय उर्फ पिंट्या मारणे मारला गेला त्याला आता सहा महिने होत आलेत. (खातरजमा करण्यासाठी ही लिंक पहा
http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Kothrud-NCP-leader-shot-dead/articleshow/6313196.cms ,
http://www.indianexpress.com/news/Gangster-Sanjay-Marne-murdered/660451 )
संजय जाणारच होता. भर चौकात रक्ताच्या थारोळ्यात. हे त्यालाही ठाऊक होतं. वेगळं काहीच घडलं नाही.
मी हे ठामपणे म्हणतोय कारण संजय माझा मित्र होता. वर्गमित्र-बेंचमित्र. लहानपणापासून तो जाईपर्यंत वरवर का होईना पण माझा त्याच्याशी मैत्रीपुरता संबंध होता. त्यामुळेच त्याच्या बाबतीतल्या ब-यावाईट गोष्टी मला अनुभवयला मिळाल्या आहेत. कुख्यात गुंड ही उपाधी घेऊन संजय ‘नावा-रूपाला ’ आला आणि गेला. एरव्ही असा कुठलाही गुंड गेला असता तर “बरं झालं, असंच होत त्यांचं” अशा शब्दांतच मी आणि माझ्या मित्रांनी प्रतिक्रिया दिल्या असत्या. तेही प्रतिक्रिया द्यायच्या सवयीमुळे. अन्यथा तेही केलं नसतं. आज सहा महिने होऊनही संजय डोक्यातून गेला नाही. लहानपणापासून त्याला पाहिलं होतं. यातून मला संजय मारणेचं उदात्तीकरण करायचय असा अर्थ घेऊ नका. त्यासाठी फ़िल्मस पुरेशा आहेत.

शाळा आणि पाळण्यातले पाय...

आम्ही एका खेडेगावात एका शाळेत एका वर्गात होतो. संजयचे पाळण्यातले पाय ६ वीत असताना दिसल्याच विशेष आठवते आहे. मुळशी-मावळात बिबा किंवा बिबई नावाचे एक झाड आहे. त्याचा चीक अंगावर उततो. म्हणजे अंगावर पुरळ येतात , मोठाले फोड येतात , त्वचा भाजल्यासारखी होऊन जाते. तर या बिब्याचा चीक जमवून संजयने त्याच्या डाव्या हाताच्या दंडावर ‘मर्द’ असा शब्द स्वतःच्याच हाताने आयुष्यभरासाठी गोंदवून घेतला होता. बाकी आम्हां मुलांसाठी हा विषय खुप चर्चेचा ठरला होता. बाईंनी त्याला त्यासाठी दोन दिवस वर्गाबाहेर कोंबडा करून शिक्षा दिल्याचही आठवतय. आम्ही त्याला पुढे शाळा सोडेपर्यंत तो मर्द वाला त्वचेवरचा डाग भाया वर करुन दाखवायला लावायचो. हा मर्द शब्द त्याला कुठल्याशा एका चित्रपटानेच देऊ केला होता.
तसा तो भांडकुदळ किंवा अहंकारीही नव्हता पण खुप खोड्या करायचा. अर्थात वर्गात इतरही बरीचशी मुले त्याच कॅटॅगरीतली असल्यामुळे तेव्हा संजय वेगळा ठरला नाही.
याउलट संजय अभ्यासात बरा होता. त्याचं अक्षर छान होतं. दर वर्षी होणा-या गॅदरींगमधेही संजय आवर्जून भाग घ्यायचा. नाटकासाठी लागणारं पाठांतर संजयकडे होतं. शाळा बुडवून इतर मुलांसारखे उद्योग त्याने केले नाहीत. त्यामुळे वर्गातल्या अ‍ॅव्हरेज मुलांसारखाच तोही एक.

शाळेनंतर...

दहावी नंतर आमच्याबरोबरीचे बहूतांश मित्र पुण्यात आलो. (रोजीरोटी, शिक्षण या कारणांसाठी) यात मी आणि संजयही होतोच. संजयने दहवी नंतर शिक्षणाच्या आईचा .... घो केला. मग आम्हा सर्वांचाच रोजचा संबंध संपला होता. कधे मधे कुणाकुणाची भेट झाली की एकामेकांविषयी चर्चा व्हायच्या. त्यात मला संजय वरचेवर भेटायचा त्याचं कारण म्हणजे त्यावेळी तो सिटर रिक्षा चालवित असे. मी कॉलेजला जाताना ब-याचदा त्याचीच रिक्षेत गेलोय. साधारण ३ वर्षे आम्ही असे भेटायचो. गावच्या, मित्रांच्या, शाळेच्या अशा रूटीन गप्पा व्हायच्या. शाळेबाहेर आणि गावाबाहेरचे हे संबंध मला छान वाटायचे. आणि बहूदा त्यालाही. पण नंतर माझ्याकडे गाडी आल्यामुळे ते वरचेवर भेटणंही कमी झालं.

एक किस्सा ...

पुढे साधारण वर्षभराने संजय मला रस्त्यात भेटला. त्याची बॉडी लॅंग्वेज आणि पोषाखात बरीच सुधारणा होती.
मी विचारलं “हल्ली दिसत नाहीस?”
त्यावर त्याने आपण रिक्षा चालवणे सोडून केबलचा आणि गॅरेजचा व्यवसाय सुरू केल्याचे सांगितले. मला आश्चर्य वाटले. इतक्या कमी वयात संजय सेटल होत होता. याउलट मी अजून शिकतच होतो. मला त्याचे कौतुक वाटले.
पण नंतर चहा पिता पिता तो म्हंटला; “ कमल्या आपन आता अजून एक बिझनेस सुरू केलाय. सुपारीचा.”
मी विचारलं; “काय सांगतोस? येवढ्या सुपा-या खपतात की सुपारीचा बिझनेस होईल.”
तो हसला म्हणाला; “खायची सुपारी नाय. द्यायची आणि घ्यायची सुपारी.”
माझं त्यावेळचं अज्ञान पाहून संजय शांतपणे आणि विस्ताराने सांगू लागला ; सिनेमात असते तशी सुपारी. म्हणजे एखाद्या माणसाचं कुठलं तरी काम आडून आहे ते सरळ मार्गाने होत नाहीये तर मग ते दुस-या मार्गाने करायचं. भाईगिरी करून. अशा कामाला सध्या खुप डिमांड आहे. पैसापण खुप आहे. कुठं रोज रोज मगजमारी करत जगा.
मी गमतीने म्हंटलं; “म्हणजे तूला वास्तव मधला ‘संजूबाबा’ व्हायचय तर...”
त्यावर त्याने शर्टचे एक बटन उघडून गळ्यातली जाडजूड चेन दाखवली आणि हातावर टाळी मारली.
जाता जाता म्हणाला ; “तुला कुणीही त्रास दिला तर आपल्याला सांग. पार जीव्व मारायचं असलं तरी सांग. आपल्या माणसांसाठी काम नाय करायचं तर मग कुणासाठी? ”
मी म्हणालो; ( अर्थात गमतीनेच. त्यावेळी मला कविता लिहिण्या-वाचण्याचं भारी वेड जडलं होतं. त्यामुळे) “ठिक आहे. मला कुणाला मारावसं वाटलं तर मी तुला सांगेन आणि समजा तुझ्या आयुष्यात असा कुणी माणूस आलाच की जो जगण्याला वैतागलाय तर तू त्याला माझ्याकडे पाठव. मी त्याला जगायला प्रवृत्त करीन.”
माझ्यासाठी महत्वाची ठरलेली गोष्ट अशी की त्यावेळी मी जे बोललो त्याचा अर्थ संजयला व्यवस्थित कळला होता कारण नंतरच्या प्रत्येक भेटीत संजय माझ्याशी खुप तारतम्य राखूनच बोलला.

पुढे पुढे...

पुढे एके दिवशी एका खुनात संजयचा हात असल्याची बातमी वर्तमानपत्रात झळकली आणि झोप उडाली. मग गावाकडचा कुठलाही माणूस भेटला तरी संजयचा विषय निघाला नाही असं नाही. काही जणांना तो खुप पुढे गेला असं वाटलं. तर काहींना त्याचा आणि आमचा काहीच संबंध नाही इतपतच मत नोंदवण्यात धन्यता वाटली. खंडणी, खुन, अपहरण अशा बातम्यातून संजय वाचायला मिळू लागला.
मी एका मित्राला म्हंटलं; “संजय जे करतोय त्याचा शेवट काय होतो हे त्याला कळत असेल म्हणजे झालं”.
त्यावर मित्र म्हणाला; “जाऊ दे रे. हल्ली पैसा खुप महत्वाचा आहे. तो त्याच्या जीवावर कमवतोय. आज त्याच्याकडे २ फ्लॅट आणि २ अलिशान गाड्या आहे. आपल्या सात पिढ्या विकल्या तरी येतिल का येवढे पैसे?”
मला काय बोलावं ते कळेना. मीच कन्फ्यूज झालो.

गुंड झाल्यानंतरच्या भेटी...

अर्थात नंतर आम्ही संजयची चर्चा करत असलो तरी त्याला भेटणे टाळू लागलो तो ज्या एरीयात बसायचा तिथे शक्यतो जायचे नाही. तोंड लपवायचे वगैरे. कारण नंतर त्याच्याशी काय बोलायचे हाच खुप मोठा प्रश्न होता.

गुंड म्हणून जग जाहीर झाल्यावर संजय एकदा भेटला. मला भीती वाटत होती. उगीच इकडची तिकडची विचारपूस झाली. मग त्याने चहाचा आग्रह केला. बसलो. चहाचं फर्मान सुटलं. म्हणाला; “हल्ली गावातलं कुणी भेटतच नाय. सगळी पोरं काम धंद्याला लागलीत.”
मी “हं” करत होतो.
मी काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं; “लग्न केलस का रे?”
तो तत्काळ; “हो. दोन महिने झाले. (अजून धक्का). तुला बोलवायचं राहिलं. घाईत झालं. एका खुनासाठी सहा महिने जेल मधे होतो. मग बाहेर आल्यावर लगेच लग्न केलं. पुढचं काही सांगता येत नाय ना... आता आपण लै फेमस झालोय. *** चा आपण उजवा हात झालोय. त्यांनीच जेल मधून सोडवलं. लग्नासाठी एक पाच गुंठ्याचा पिस दिला एका बिल्डरनी.”
संजय बोलतोय म्हणूण मी धाडसाने विचारलं; “तुला हे सगळं करताना भीती नाही का वाटत?”
म्हंटला;“कुनाची भीती? आपल्याला लोक घाबरतात. आपण नाय कुनाच्या बापाला भीत.”
मग पुढे कधे मधे संजय आणि मी भेटलो. नंतर त्याची भीती नाहीशी झाली पण त्याच्या ‘प्रतापां’विषयीचे कुतूहल वाढत राहिले.
नंतर भेटलो तेव्हा तो म्हणाला; “काय कमल्या, बिझनेस चालू केलास कळवलं नाहीस. हिच का दोस्ती? बरोबरे तुम्ही आम्हांला कशाला बोलवाल? तुमचे दोस्त स्टॅंडर्ड.”
त्याला माझ्या कामाविषयी कुणाकडून कळलं होतं. त्यावर मी काही तरी सारवासारव करून वेळ मारून नेली. पण त्यातून संजयला समाजात टिकून राहण्याची गरज दिसली.
त्यावेळी तो म्हणाला होता की बिझनेसमधे पेमेंट थकलं, कुणी त्रास दिला तर सांग. सगळे लोक चांगले नसतात. तुझं काम करून देईल. तुझ्यासारख्या सज्जन माणसाचं काम करुन पूण्यच मिळेल.
(त्याच्या सुपारीच्या क्षेत्रामुळे मी त्याला ‘सज्जन’ वाटणं सहाजीक असावं. असो.)
पण त्यावेळी वेळापुरता का होईना मला संजयचा आधार वाटला. वर्थ सिच्यूएशनला एक तरी हक्काचं माणूस मागे असल्याचा. (पुढे अशी गरज पडू द्यायची नाही आणि पडली तर हा मार्गही निवडायचा नाही हेही उमगलं.)
मी एकदा विचारलं की तुला जीवाची, पोलिसांची इतकी भीती आहे मग हा धंदा सोडावासा वाटत नाही का?
त्यावर तो म्हणाला की रिस्क सगळीकडे असते. इथे जरा जास्त. डायरेक्ट वरचा रस्ता. त्याची भीती वाटते कधी काय होईल नेम नाही. म्हणूनच आता मी राजकारणात उतरणारे. कॉर्पोरेशनला. (धक्के पे धक्का) *** शी बोललोय. त्यांनी तिकीटाचं कबूलही केलय. मग आता वॉर्डात रक्तदान, वॄक्षारोपण चालवलय. शाळा काढणारे. लोकांचा पाठिंबा आहे आपल्याकडं. ऑफिस टाकलय. वगैरे.

त्यावेळी मात्र मला चरचरल्यासारखं झालं. उद्या संजयसारख्या माणसाला आपण आपला नेता म्हणून पहायचं? त्यात तसं करून त्याचे बाकीचे धंदे बंद होणार असते तरी काही हरकत नव्हती. पण तशी शक्यता तरी कुठली. तो जीवाच्या भितीने सेफ व्हायला राजकारणात येऊ पाहत होता. संजय बरोबरच्या गप्पातून लॅंड माफिया, बिल्डर्स आणि राजकारणी यांचं परस्पर हितसंबंधांचं साटोलोटं समजलं. दुसरीकडे आपण सगळे सामान्य माणसं यापासून किती दूर आहोत हेही उमगलं.

संजयचा खुन...

संजयचा खुन झाल्याची बातमी मला आमच्या एका मित्राने सांगितली. तेव्हा तो म्हणाला की तू जे म्हणायचास तसच झालं पण हे येवढ्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं. संजय गेला हा संजयच्या बाबतीतला फायनल धक्का होता. खरच हे इतक्या लवकर होईल असं ध्यानीमनी नव्हतं. पण हे होणार होतं हे खरं.
संजयच म्हणाला होता एकदा “तसा भरवसा नाही कधी काय होईल. इतक्या लोकांचे तळतळात आहेत उरावर...”
आणि मला हेही तो म्हणायचा की “भेटत जा. तू भेटलास की बरं वाटतं. बोलावसं वाटतं. लोक टाळतात मला.”

आता संजय भुतकाळ आहे. वर्तमानात असे अनेक संजय आजूबाजुला असतीलच. याचे अर्थ आणि याची उत्तर काय हे प्रश्न तसेच पडून आहेत. कदाचित जगभर...

Friday, December 31, 2010

गाववाला

परवा एक गाववाला मित्र दोनेक वर्षांनी भेटला म्हणे; "जमिन धरणात गेली. आमचं पुनर्वसन म्हणून जी जमिन दिलीय ती इतकी नापीक आहे की विचारू नकोस".
मनात म्हंटलं "मी कुठे विचारतोय....?"
मी म्हंटलं "मग सध्या पोटापाण्याचं काय?"
म्हंटला "तसं एका ठिकाणी ऑफिसबॉयचं काम करतोय नाही असं नाही पण खरं सांगू का?
गावाकडं होतं ते बरं होतं. इथे शहरात जीव नुसता..."(सगळं त्याच्या ग्रामिन भाषेत.)
हा भेटला की मला इरीटेट होतं. काहीही बोला हा नेहमी रडतच असतो... मी म्हंटलं "मग मिळालेल्या जमिनीचं काय करणार? विकणारेस?" म्हणाला "नाही अशी पुनर्वसनाची जमिन लगेच विकता येत नाही. नाय तर विकली असती." माझ्या "का?"वर म्हणाला "जमिनीत काय उरलय आता? " पुराण सुरू.
याला असं वाटत असावं की मी खूप सुखी आहे. का? तर मी नावापुरता गाववाला. शहरात वाढलेला. आता त्याला कोण काय करणार? असो.
त्यानं विचारलं लग्न झालं का? म्हंटलं नाही. तुझं?
म्हणाला "झालेलं। बायको सोडून गेली."
म्हंटलं "काय सांगतोयस? यातलं मला काहीच माहिती नाही। कधी?"
म्हंटला; "गावातल्या चांगल्या चमडीच्या पोरी सोडल्या तर अजून काय माहिती आहे तुम्हांला?"
"धरणात पायाखालची जमिन गेली नाही फक्त कैक आयुष्य। संसार संपले...! कुणाच्या तरी डोक्यात येतं इथे धरण बांधायचं... की बांधलं। धरणाला ना नाही; पाणी सगळ्यांना लागतं पण आज आमच्या जागेत ज्या लोकांसाठी पाणी साठवलं जातं त्या लोकांपुढं उभं रहायला भीती वाटते रे...! गाव धरणासाठी हलवायचा नाही म्हणून जे जे लढले ते आज गलेलठ्ठ झालेत. नसलेली झाडं दाखवून. त्यापैकी किती तरी लोक दारू ढोसून ढोसून संपायच्या मार्गावर आहेत.
नेत्यांनी फक्त पैसेवाल्यांनाच आपलं मानलय. पण गावातल्या टाळक्यांना कोण अक्कल देणार? ज्यांनी धरण बांधायचं ठरवलय ते हात झटकून उभेत. लोक डोळ्यांदेखत संपतातेत. बघवत नाही रे. कुठं अन कुणाचं चुकतं तेच धड कळत नाही."
"असो, असं खुप काही आहे, प्रॉब्लेम फक्त इतकाचे की गावाला काही उरलं नाही आणि शहरात कुणाला काही देणं-घेणं नाही. आज आत्महत्या केली तरी दखल घ्यायला मी शेतकरी नाही...! "
तो म्हणतोय ते सगळंच खरं असावं कारण त्याचं हे ‘रडणं’ वेगळंच वाटलं. जाता मी फ़क्त त्याचा मोबाईल नंबर घेतला आणि विचारलं "परवा काय करतो आहेस? भेटूयात."

Wednesday, December 8, 2010

महासत्तेचा बुडबुडा

भारत महासत्ता बनेल म्हणजे नेमकं काय घडेल?
आपण खुप सुखवस्तू झालेले असू? की किमान पातळीवर भूकबळी, दारीद्र्य, बेरोजगारी अशा समस्यांचं उच्चाटन होईल? आपल्याला ठाऊक नाही। कारण ‘भारत महासत्ता बनणार आहे.’ येवढी गोष्ट ऐकूनच बरं वाटतं. मग महासत्ता म्हणजे नेमकं काय याची दखल घेतली काय नि नाही काय ? काय फ़रक पडतो आपल्याला?
पण आपल्याला आपल्या अज्ञानाची किंमत चूकती करावी लागणारच आहे. आजही आपण ती चूकती करतो आहोत. असो. मूळात महासत्ता म्हणजे नेमकं काय याचं ठोस उत्तर कुठल्याच राजकारण्याकडे नाही. आठवड्याला एक या प्रमाणे राजकारणी आणि त्यांच्या संगनमाताने होत असलेले घोटाळे बाहेर पडू लागले आहेत.(उघड न होणारे घोटाळे वेगळे.) या सर्व घोटाळ्यांचं खापर एखाद्या सोईच्या व्यक्तीवर फ़ोडलं जातं. त्यात त्याला शिक्षाही पुरेशी होत नाही. शिवाय पब्लिकचा पैसाही परत मिळण्याचा प्रश्न उत्पन्न होत नाही.एकाही राजकारण्याकडे स्वत:ची अशी कुठली ‘विकस योजना’ नाही. पण हवे ते खाते मिळवण्याची महत्वाकांक्षा तेवढी नक्की आहे. ती सुद्धा उघड.
इकडे आपण कळत असून दुर्लक्ष करणारेच आहोत. आपल्याकडे सुद्धा स्वतःच्या भविष्याचा कुठला प्लॅन असतो. आणि तसाच तो सामाजिक पातळीवरही नसतो. शहरांमधे आज जी बकाली झाली आहे. त्याला आपणच जबाबदार आहोत. आणि अशी बकाली घालवायला आपल्याला खुप कष्ट देखिल पडणार नाहीयेत। पण तरी आपण साध्या-सुध्या गोष्टी करणं शक्य असूनही करत नाही. त्याची किंमत आपणच चूकवतो आहोत.
भारत महासत्ता बनो न बनो. आपण महासत्तेसाठी लागणा-या मानसिकतेपासून कोसो दूर आहोत. तेव्हा आपले राजकारणी काहीही बरळोत., अशा बुडबूड्यांमधे शिरून आपल्या हाती काय लागणार आहे हे ज्याचं त्याने ठरवावं. आपले ‘साहेब’ मंत्री झाले तरी आपल्याला कुणी फ़ुकट जेवायला घालत नाही. त्यासाठी शांत राहून कष्ट करावेच लागतात.